Tuesday, August 14, 2007

मी आणि "जिबली'


उद्या पंधरा ऑगस्ट, आपला स्वातंत्र्य दिन. आणि मला आतापासूनच जिलबीचे वेध लागलेत. मस्त केशरी रंगाची गोड जिलबी! माझ्या खाद्ययात्रेत जिलबी अगदी महत्त्वाची आहे. लग्नातली जिलबीही मी चापून खातो, डायबेटिस असलेल्यांसाठी पाकात न सोडलेली फक्त तळलेली जिलबी असते ना, तीही सुरेख लागते. आम्ही तीही सोडत नाही, यावरून काय ते ओळखा. मी अगदी लहान म्हणजे दोन-अडीच वर्षांचा असतानाची ही गोष्ट आहे. अर्थातच आई-बाबांनी सांगितलेली. आम्ही काश्‍मीरला गेलो होतो. तेव्हा तिथे अतिरेकी नसले तरी साडेसात आठला दुकानं बंद व्हायची. तर अशाच एका रात्री दहाच्या सुमारास मी सूर लावला, "मला जिबली पायजे...' झालं, बिस्कीटं, चॉकलेटं देऊन झाली; पण सूर थांबेना. मला जिलबीच हवी होती. बाबांच्या मित्रांचा ग्रुप होता. रात्री निघाले सगळे बाहेर "जिबली' शोधायला. एका दुकानदाराला हातापाया पडून उठवलं. जिलबी आणली. ती मी खाल्ली. मगच झोपलो. घरात माझ्या पोटाचा विषय निघाला (तो रोजच आणि किमान तीन वेळा निघतो... त्यावेळी मनाला काय वेदना होतात, ते सूज्ञांना ठावकीच असेल.) की जिलबीचा विषय हटकून निघतोच निघतो. "हा तेव्हापासूनच असा...' इति मातोश्री!
तर विषय जिलबीचा होता. उद्या सकाळी उठायचं. झेंडावंदन झालं, की कुमठेकर रस्त्यावरच्या इंदौर फरसाणवाल्याकडून (कुलकर्णी पेट्रोल पंपाच्या मागच्या बाजूला) चांगली साजूक तुपातली एक किलो गरमागरम जिलबी आणि ढोकळा घ्यायचा. नाष्टा तोच आणि जेवणात पक्वान्नही तेच. जिलबी आणि ढोकळ्याशिवाय पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोन राष्ट्रीय सण साजरेच होऊ शकत नाहीत. पूर्वी बाबा फापडा आणायचे. बाजीराव रोडवर नूमविच्या शेजारी बॉम्बे फरसाण म्हणून अगदी लहानसं दुकान होतं. ते पापडीसाठी एकदम फेमस... त्याच्याबरोबरची चटणी एकदमच टॉप. त्या पापडीमध्ये चटणी भरायची आणि हाणायची. क्‍या बात है...
याच जिलबीवरून आठवलं. मागे महिनाभर राजस्थानात हिंडत होतो. बाटी, कचोरी आणि आलू पराठा (बदबद अमूल घालून) खाऊन कंटाळा आला होता. आम्ही कोट्यामध्ये होतो. रात्री झोपताझोपता हाच विषय झाला. सकाळी उठून लॉजच्या गॅलरीत गेलो, तर खाली पोह्यांची गाडी लागली होती. तातडीनं पळत पळत खाली गेलो. (शंकेखोरांसाठी : दात घासून झाले होते) पोहे किती प्रकारचे असावेत? गोड पोहे, साधे पोहे, तिखटाचे पोहे, तर्री टाकलेले पोहे... सगळे एक एक प्लेट हाणले. पोहे संपताहेत तोच त्यानं इमृती तळायला घेतली. (जिलबीच ती... गर्द केशरी रंगाची आणि वळ्यावळ्या असलेली) आहाहा... दिवसाची सुरवातच गोड तर दिवस किती गोड गेला असेल कल्पना करा...
असो, मुद्दा जिलबीचा होता. तो संपला. उद्या भेटूया इंदौर फरसाणवाल्याकडे सकाळी 8 वाजता...

1 comment:

Anonymous said...

जागतिकीकरणामुळे शिक्षणात प्रचंड बदल होत आहेत. या बदलत्या प्रवाहामुळे अनेक आव्हाने उभी राहीली आहेत तसेच नवीन संधीही निर्माण झाल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातील आव्हानांना कसे सामारे जायचे, आणि नवीन संधीचा फायदा कसा उठवायचा याचा समस्त भारतीयांना विचार करावा लागणार आहे. या नवीन बदलांना समोरे जात असताना आपली शिक्षण व्यवस्था खरोखरच सक्षम झाली आहे का ? याचा गांभीर्याने विचार करणे आवश्‍यक आहे. एका बाजुला आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा संस्था उदयास येत आहेत, तर दुसऱ्या बाजूला खेडोपाड्यातील मुलांना धड वर्गांची उपलब्धता होत नाही. एक समुह असा आहे की, तो शिक्षणासाठी लाखो रुपये सहजपणे मोजू शकतो; तर दुसरा समुह असा आहे, की ज्याला पोटाचे खळगे भरण्याची भ्रांत पडलेली आहे. अशा परिस्थितीत "शिक्षण क्षेत्रातील आव्हाने' पेलून आपला देश नवीन संधीचा अचुक फायदा उठवू शकेल का ?
शिक्षण क्षेत्रातील अशा विषयांवर चर्चा करण्यासाठी तुम्ही नक्कीच www.patipencil.blogspot.com ला भेट द्या.