Monday, August 6, 2007

पाणी-पुरी गोड असते का तिखट?

पाणीपुरी म्हणलं की पुदिना-हिरव्यागार मिरचीच्या दर्जेदार पाण्यानं भरलेला माठ, रटरट उकळणारा रगडा, चिंचेचं पाणी अशी एक एक गोष्ट डोळ्यासमोर नाचू लागते.


चव आठवली की ठरलेल्या पाणी पुरीच्या गाडीवर न थांबता पुढे जाऊ शकणारे नसावेतच बहुतेक.एक गोड, एक मिडियम, एक तिखट म्हणल्यानंतर पुरीबरोबर भैय्याचा हातही कोपरापर्यंत पाण्यात बुडून बाहेर येतो. गोड तिखट आंबट अशा तीव्र चवीचं रसायन पुरीबरोबर तोंडात जातं. नाका-तोंडातून पाणी येतं. कुठल्या हातानं नाक पुसू अन्‌ डोळ्यातलं पाणी पुसू अशी भयंकर गोची होते. पाणी-पुरी गोड असते का तिखट? असं खरंच काही सांगता येणार नाही. कारण, पाणी तिखट आहे असं म्हणेपर्यंत पुरीच्या कोपऱ्यातलं चिंचेचं पाणी अलगद जिभेवर पसरतं. आणि मग पुढची पुरी अलगद तोंडात जातेच.चवीपुढे, पाणी कुठलं वापरलं असावं, माठ धुतलाय का नाही, या भैय्यांनी हात कधी धुतलेत अशा गोष्टी एकदम गौण ठरतात. जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक पाणी-पुरी आवडणारी आणि दुसरी न आवडणारी. सुदैवानं दुसऱ्या प्रकारची माणसं अजून भेटायचीयेत. ती भेटेपर्यंत तरी कल्पना भेळेशेजारची तर कधी लक्ष्मी रोडवर अभ्यंकर ऑप्टेशियन्सच्या जवळची, तर नारायण पेठेतली व्यास पाणी पुरी अशी एक- एक दर्जेदार ठिकाणं पाणी-पुरी या विषयाचा व्यासंग वाढवतायंत.

No comments: